रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्यात जयगड परिसरातील प्रमुख ग्रामस्थांची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेत नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांनी मार्गदर्शन केले.
नौदलाचे लेफ्टनंट कमांडर श्रेयस शिरसीकर यांनी सागरी सुरक्षेबद्दल सविस्तरपणे महिती दिली. ‘मासेमारी करताना देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे ५०० मीटर अंतराबाहेरच मासेमारी करावी. सोबत आपली आधारकार्डसारखी ओळखपत्र मूळ स्वरूपात बाळगावी, परदेशी नागरिक घुसखोरांची माहिती मिळाल्यास ती माहिती १०९३ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. मासेमारी नौकेवर असणाऱ्या ‘व्हीएचएफ’ या वायरलेस साधनाचा यथोचित वापर करावा,’ अशा मार्गदर्शक सूचना शिरसीकर यांनी केल्या.
या वेळी उपस्थित ग्रामस्थांपैकी जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी, मत्स्यव्यवसाय संस्थेचे सचिव मुंतहा टेमकर, जयगड शिवसेना शाखाप्रमुख अनिस आडुरकर यांनी नागरिकांच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या. या सूचनांची दखल घेत यांवर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
या कार्यक्रमाला जयगड सागरी पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. यात जयगडचे माजी सरपंच रवींद्र पोटफोडे, फरजाना डांगे, सरपंच शगुफ्ता मालदार, तबरेज सोलकर, सलीम मीरकर, कमलाकर बोरकर, सुधाकर शिर्के, उमेश गद्रे, नासीर संसारे, नांदिवडे गावाचे सरपंच अरुण आडाव, विकास पारकर, लिलाधर खाडे, शिवसेना शाखाप्रमुख ऋषीराज धुंदूर, पोलीस कर्मचारी सचिन वीर आदींचा समावेश होता. अनिरुद्ध साळवी यांनी आभार मानले.